Wednesday, 7 August 2019

विचार धारा

आजचा दिवस नेहमीसारखा उजाडला.एक आठवड्यानंतर पावसाने आज उसंत दिली होती.वातावरणात नाही म्हटले तरी अजूनही गारवा जाणवत नव्हता.खरचं का... आपली मने ही या वातावरणाशी जुळवून घेऊ लागलीत.त्यामुळे माणूस नात्यांना ही विसरु पाहतोय.मागच्या आठवड्यात पूर येऊन बरीच कुटुंब उद्ध्वस्त झाली. मनं अगदी खिन्न होते.पण आपल्यासाखी सामान्य माणसे मनात असताना ही काय करू शकतात?याचा विचार दिवसेंदिवस छळत जातो.आपल्याकडून काहीतरी मदत आपण कसल्याही स्वरूपात करू शकतो.हे ही काही थोडके नाही. पण प्रत्येक वेळी आपण ती बातमी बनवण्याची गरज वाटत नाही. कारण आपण ही या समाजाचे ऋणी आहोतचं ना..आज समाधान वाटले.फक्त विचार करून,प्रत्यक्ष आपण अशी कामे केल्यावरचे समाधान म्हणजे .......जीवनाचे सार्थक झाल्याचा आभास होतो.

  ✍️©®अनिता कळसकर
     कल्याण.

Sunday, 21 July 2019

वसंत फुलला


नववधूचा साज लेऊनी
वसंत फुलला
वसुंधरेला सजवाया
वसंत ऋतू आला .

धरणीवरती चारी दिशांनी
ऋतूंचा राजा वसंत येऊनी
कोकिळेची मंजुळ गाणी गाऊनी
अमृताचे प्याले भरूनी ..वसंत ऋतू आला

पानगळ जाऊनी पालवी फुटली
सप्तरंगाची उधळण करूनी
मधुगंधाचे शिंपण करूनी
शेतात चैतन्याची गुर्मी घेऊनी ...वसंत ऋतू आला.

वृक्षांचे सांगाडे गेली बहरूनी
नवचैतन्याला जाग येऊनी
फुलाफुलांत अमृत भरूनी
भृंगराजाने मध गोळा करूनी..वसंत ऋतू आला

विरहात डुंबूनी गेलेल्या युव-युवतींना
प्रेम मिलना मादक काळ देऊनी
असा हा बसंत ऋतू आला
शृंगाराची कथा गेला सांगूनी ..वसंत ऋतू आला.

हिरव्यागार या मखमली शय्येवर
पानाफुलांची ओंजळी धरुनी
लावण्य नटवाया ही वसुंधरा आली
कोकिळाही संतुष्ट पंचमस्वर गाऊनी ...वसंत ऋतू आला
   ---✍️©®सौ.अनिता कळसकर
       कल्याण

Saturday, 20 July 2019

कवितेचे नाव --ऋण

चला मुलांनो आज करू या
निर्धार पक्का झाडांशी
सगळे मिळूनी झाडे लावू या.
धरतीचे ऋण फेडू या. १

पर्यावरणाच्या समतोलाचे
महत्त्व आपण जाणू या
विज्ञानाची कास धरूनी
शास्त्र आपण समजून घेऊ या.२

जीवन जगणे सार्थ करू या
फळाफुलांशी नाते जोडू या.
वसुंधरेला सजवायाला
पावसाला गवसनी घालू या. ३

आसुसलेली धरा ही आपली
घेऊन थेंबाला कवेत
नवाकुंराचे बीज लपविते
काळ्या मातीच्या उदरात. ४

होते भरभराट पिकाफळांची
बळीराजाच्या मेहनतीला
आनंदाचे उधाणं येई
किंमत मिळे तेव्हा मालाला..५

नटलेली वसुंधरा दिसे
मखमली हिरवा शालू लेऊनि
सजते नव्या नवरीसारखी
लाल,पिवळ्या पानाफुलांनी .६

निसर्गाची ही किमया
प्रीतीला देते जगण्याची आशा
फुलांच्या या सुवासाने
मनी जागतात जीवनाच्या नव्या दिशा...७
चला मुलांनो आज करू या
निर्धार पक्का झाडांशी...

   ✍️©®अनिता कळसकर
   कल्याण

Friday, 19 July 2019

सुविचार

फुलांनी फक्तं उमलायचे असते.
बहरणारं तर झाड,वेली,लता असतात.
तोडणारे हात कधी पुजाऱ्याचे तर
कधी नराधमाचे असतात.
हिरव्यागार पर्णाची विविध नक्षी
विविध रंगांची,आकाराची फुले सुगंध देतचं असतात.

,✍️©®अनिता कळसकर

Saturday, 13 July 2019

आजचा प्रवास

आज दिवस सुंदर उगवला. पहाटेच्या धुंद बरसणा-या सरींना उधाण आले होते.मनं अगदी प्रसन्न झाले.बागेवर नजर फेरली.फुलांच्या सुगंधाने वातावरण उजळून निघाले होते.कल्पना नसलेल्या गोष्टी आयुष्यात अचानकपणे घडून जातात.समजतं नाही काय करावे?पण या निसर्गाच्या सान्निध्यात राहून मनाला वेगळीच कलाटणी मिळते.पहा ना...
       प्रत्येक सुगंधी फुलाला जीवन ते किती असते?पण ते फुल किती आनंदाने आपल्याला जीवन जगायला शिकवते.जोपर्यंत झाडावर, वेलीवर आहे,तोपर्यंतच त्याचे आयुष्य असते. त्यांना ज्यावेळी झाडावरून तोडले जाते.तेव्हा त्या झाडाला ही वेदना होतचं असतात ना...!पण आपणाला त्या दिसतं नाही. कालांतराने त्या झाडांना नवीन पालवी फुटते.परत फळांफुलांची रेलचेल चालूचं होते....
    मानवाचे जीवन तरी कुठे वेगळे असते?प्रत्येक मोठ्या संकटावर मात करूनचं तर पुढे जायचे असते.आठवणी या मनाच्या एका कप्प्यात साठवून ठेवायच्या.व ईश्वराने दिलेले जीवनाचे दान आनंदाने पार करायचे.शेवटी काय घेऊन जाणार सोबत... असे विचार सकाळीच मनात आले व संपूर्ण दिवस आनंदाने घालवायचा ठरवले .
   या जन्मावर या जगण्यावर शतदाः प्रेम करावे.

  ✍️©® अनिता कळसकर

Friday, 5 July 2019

मृगाचा पहिला पाऊस


⛅🌩⛈

काळे सावळे ढग
भरून आले आभाळात
लागली चाहूल म्रुगाची
मोर डोलला आनंदात..

पहिला पाऊस अवनीवर
मातीच्या गंधात गहिवरला
आसुसलेली धरा कवटाळून
घेते उदरांत त्या थेंबाला..

वाट पाहून आता
थोडी विसावली धरा
पावसाच्या या थेंबाला
म्हणे अमृताचा झरा..

सृष्टीची केली घाण
म्हणून देतो शाप पाऊस
येईल येईल म्हणतो
करतो मात्र उदास...

तुजविण रिती अवघी
मानवजात उदासीन
पर्यावरणाची कास उद्ध्वस्त
किती केली आम्ही महान?

कापून झाडे दिली
दिला पेटवून डोंगर
विकासकाने केला फक्त
इमारतीचा बाजार..

जातो रूसून पाऊस
तरी मानव समजून अनभिज्ञ
सुधार रे मानवा तू
निसर्गाचा कर जागरयज्ञ..

नको विसरू सृष्टीला
तू आहेस एक ध्यास
सांभाळ कर तिचा
पृथ्वीचा मोठा हा व्यास..

   ✍️ ©® *अनिता कळसकर

काव्यांजली

मन माझे
गुंतून गेले तुझ्यात
धुंद गीत
ओठी..

रोज सख्या
फुले प्राजक्त नवां
मज हवा
माळण्यास..

सकाळची फुले
सुकून किती गेली
केसांत माळलेली
आवडीने...

जीवन प्रवास
रोजचं असतो खास
जगण्याचा ध्यास
सगळ्यांना.

जीवन एकट्याचे
जन्म ही एकदाच
मिळतो असाच
कर्माने..।

✍️©® अनिता कळसकर
              कल्याण